Saturday 7 July 2012

मंतरलेले ते 5 दिवस!!!!

     नंदगाव. भारताच्या नकाशावर काय पण राजस्तानच्या नकाशावरही लवकर सापडणार नाही असे ठिकाण. अबूरोड पासून 60 कि.मी. अंतरावर असलेले हे गाव एका बाजूने माउंट अबूच्या पर्वतरांगांच्या पायथ्यास वसलेले आहे. बाकी तिन्ही बाजूस रेतीचा सागर. जसे जसे आम्ही नंदगावच्या जवळ जात होतो तसे तसे खुरटी झुडपे आणि रेतीचे प्रमाण वाढत होते. बस मधून इथले वातावरण पाहून पुढील 5 दिवस कसे जातील याबाबत साशंक होतो. आम्ही 5 दिवसाच्या शिबिरासाठी नंदगावला आलो होतो. शिबीरचे नाव होते गोवत्स पाठशाला. पाठशाळेत पोहचताच आम्ही आश्चर्यचकित झालो. रेतीच्या सागरावर दुतर्फा हजारो हिरवीगार झाडे आमच्या स्वागतासाठी सज्ज होती. हिरवेगार वातावरण पाहून मन सुखाऊन गेले.



    

     शिबिरात आलेल्यांमध्ये 80% गोवत्स हे तरुण होते. शिबिराची सुरवात सकाळी 5 ला झाली. ज्यांनी आयुष्यात झोपेतून उठून पहाटेच्या 5 ची वेळ पहिली नव्हती (बहुतेकांनी जागरण करून पहाटेची 5 ची वेळ पाहिलेली असावी) ते सुध्दा लवकर उठून प्रभात फेरीसाठी तयार झाले. सगळ्यांचा पेहराव तो काय.. आहाहा... चक्क धोतर-बंडी अथवा कुर्ता-पायजमा! मेक-अप तर अजून भारी. सगळ्यांच्या कपाळावर U आकाराचा चंदनाचा अथवा कुंकवाचा टिळा! जीन्स ऐवजी धोतर, सौंदर्य प्रसादना ऐवजी टिळा, ब्रांडेड बुटा ऐवजी अनवाणी पायाने फिरणे हे सगळेच विलक्षण होते. भजन कीर्तन करत प्रभात फेरी साधारणता 2-3 कि.मी. अंतरावर जात असे. वाळवंट तुडवत तुडवत भक्तीत लीन झालेले गोवत्स पाहून मनाला एक वेगळाच आनंद होत होता.
 




     समोर 15-20 गोठे होते. प्रत्येक गोठ्यात अजून एक छोटा गोठा होता. साफ सफाई करण्याच्या वेळी सर्व गाई छोट्या गोठ्यात ठेवलेल्या असत. प्रत्येक गोठ्यात 100 ते 250 पर्यंत गाई होत्या. (जवळपास 20000 गाई ह्या गोशाळेत आहे ) एका बाजूला पाण्याचा हौद तर एका बाजूला शेणाचा ढिगारा होता. गायीसाठी चारा खाण्यासाठी पत्र्याचे हौद बनवलेले होते. आता वेळ होती गोसेवेची. गोठ्यातले शेन गोळा करून गोठा स्वच्छ करत होतो. गायीसाठी पौष्टिक द्रावण चार्यामध्ये टाकत होतो. कुणी आई नसलेल्या वासराला बाटलीने दुध पाजत होते तर कुणी गाईच्या पाठीवर हात फिरवत होते.





    
     स्वच्छता मोहीम झाल्यावर नाश्ता करून प्रवचनाला (चर्चा सत्र ) जात होतो. ह्या सत्रात वैचारिक देवाण घेवाण तर होतच होती पण संकीर्तनामुळे वातावरण भारलेल्यासारखे असत. काही गोवत्स आनंदाने नाचत होती तर काही जन तर फुगडी आणि दहीहंडी करण्यात धुंद झालेली. हे सत्र संपल्यावर जेवण करून विश्रांती घेत. जेवण तर इतके अप्रतिम असत कि त्यापुढे शाही रेस्टारेंट पण फिके पडतील. इथले दुध तर जिंदगीत कधी पिलो नसेल इतके चविष्ट. तुपातले पदार्थ तर अहाहा... अजूनही त्यांची चव जिभेवर रेंगाळत आहे. गावठी गाईचे दुध पहिल्यांदा पीत होतो. (घरी आल्यावर जर्सीचे दुध, तूप खाणे कमी झाले आणि चहा तर सुटल्यातच जमा ) विश्रांतीनंतर परत अंघोळ करावीच लागत. भयंकर उकाडा असल्यामुळे पाण्याची भरपूर सोय केलेली. पुढील सत्राला जाण्यापूर्वी थंड ताक अथवा ज्यूस उकाडा पळवायला मदत करत. ह्या सत्रात पण वैचारिक देवाण घेवाण, प्रश्न-उत्तरे संकीर्तन चालत असे.


    गोमातेची आरती झाल्यावर जेवण करून परत भजन कीर्तन करत. दुध पिऊन भक्ती भावात झिंगणारे तरुण प्रथमच पाहत होतो. (आज काल झिंगण्यासाठी दारू लागते पण पाठशाळेत तर दुधानेच नशा चढला होता.) इथे वेंगा बोईज नाही विठ्ठल होता, मडोना नव्हती मीरा होती, शकिरा नव्हती श्रीकृष्ण होता. गोपाल होता. राधा होती. गोमाता होती. भाव होता. भक्ती होती. "नैनोमे निंद भर आई श्रीबिहारीजीकें"  हे भजन झाल्यावर पाठ्शालेचा दिवस संपत असत.


     एके दिवशी पतमेडा गोधाम तीर्थला गेलो. नंदगाव पासून 70 कि.मी. अंतरावर असलेल्या पतमेडा मध्ये प. पू. दत्तशरणजी महाराजांनी 1993 मध्ये 8 गाई कसायांपासून सोडवून गोशाळेची स्थापना केली. आज पूर्ण राजस्तानमध्ये पतमेडा गोशाळेच्या विविध शाखेमध्ये सुमारे सव्वा लक्ष गाई आहे. गाईसाठी सुसज्ज (वातानुकुलीत आणि क्ष किरण यंत्रणा ) असे रुग्णालय आहे. ह्या धन्वंतरीमध्ये रोज अपघातात जखमी झालेल्या गायीना उपचारासाठी आणले जाते. काही गायीना पाय नव्हते तर काहीना शिंग. कुणाच्या पाठीतून रक्त वाहत होते तर कुणाच्या डोळ्यात प्रकाशच नव्हता. अश्या गाई पाहून कुणाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या नसत्या तर नवलच!


      प. पूज्य  दत्तशरनजी महाराज आणि त्यांचे शिष्य प. पुज्य राधाकृष्णजी महाराज ह्यांनी गोवत्स पाठशाळेचे आयोजन केले होते. राधाकृष्णजी महाराज अवघे 30 वर्षाचे. त्यांची वाणी, गाणी अप्रतिम. दोन्ही महाराजांनी हिंदूंसाठी (मानवजातीसाठी ) गाईचे महत्व का आहे ते सांगितलेच पण पुरावे देण्यासाठी आयुवेदाचार्य, डॉक्टर्स तसेच सामाजिक संस्थेच्या मान्यवर लोकांचे चर्चा सत्र आयोजित केले होते. म्हणजे इथे फक्त भक्ती नव्हती तर विज्ञान पण होते. एक चळवळ होती. गोहत्या थांबवण्याचे आवाहन होते आणि गोसंवर्धन करण्याची विनंती होती. गोहत्या बंदी कायद्याचे मार्गदर्शन होते. सगळ्यांचा ध्यास, विचार, कृती एकच - गोसेवा.






     पाठ्शालेचा शेवटचा दिवस. निघण्याची शारीरिक तयारी झालेली पण मानसिक तयारीला वेळ लागणार होता. राधाकृष्णजी महाराजांच्या दर्शनाला गेलो. पाहतोय तर काय!! नेहमी उल्हासित असणारे वातावरण आज धीर गंभीर झाले होते. महाराजाचे लाडके शिष्य चक्क महाराजांना मिठी मारून रडत होते. महाराजजी स्वताच्या रुमालाने शिष्यांचे डोळे पुसत होते. दर्शन घेऊन निघालो आणि ठरवले पुढच्या वर्षी परत येऊ.


     घरी आलो ते विचार घेऊनच. आता दिशा शोधायची आहे, कृती करायची आहे, गोसेवा करायची आहे. आपण करणार का मदत गोसेवा, गोसंवर्धन आणि गोहत्या थांबवण्यासाठी???

 जय गोमाता, जय गोपाल !!!!!!!







 

No comments:

Post a Comment