Sunday 15 April 2012

शिर्डी वोही आते हे जिन्हे साई बाबा बुलाते हे

     दर वर्षी प्रमाणे ह्यावर्षीही कोपरगाव ते शिर्डी साईबाबांच्या पादुकांची पालखी राम नवमीच्या दिवशी निघाली. मी पहिल्यांदाच  पायी जाणार्या पालखीत सामील झालो होतो म्हणून मनात भरपूर उत्साह होता. कोपरगाव ते शिर्डी साधारणता २० कि. मी. अंतर आहे. पालखी कोपरगावातून जाणार म्हणून सारा कोपरगाव लख्ख झाडून पुसून ठेवल्यासारखा दिसत होता. पालखी मार्गावर सडे रांगोळ्या काठलेल्या होत्या. वातावरणात एक वेगळाच उत्साह होता.




१ एप्रिल वेळ ५:४५ संध्याकाळ.
     मी आणि माझे मित्र चेतन, सुमित आम्ही तिघांनी सर्वप्रथम पालखीला खांदा देऊन आणि पादुकांचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरवात केली. पायी चालता येते असे सगळेच ( वय वर्ष ४ ते ७०+ ) गप्पा टप्पा करत तर कुणी भजन म्हणत, काही तर मौन पाळत भक्तिभावाने निघाले. अर्ध्यापेक्षा जास्त भक्त अनवाणी पायाने चालत होते. जमीन भरपूर तापलेली पण थंड वारा मन उल्हासित करत होता. डोक्यामध्ये विचारचक्र चालू झाले होते. सारे जन एका फकिराच्या दर्शनासाठी उतावीळ झाले होते. काय जादू असेल त्या फकीरात काय माहित पण इतके सारे लोक लोह्चुम्बकाकडे लोखंडाने आकर्षिले जावे तसे चालत होते. फकिराच्या 'श्रीमंत' देवस्थानात पोहचण्याची घाई झाली होती.
   
     नजर जाईल तिथपर्यंत जनसागर दिसत होता. रस्त्यात ठीक ठिकाणी खिचडी, पोहे, आईस क्रीम, उसाचा रस, पाणी वाटप केले जात होते. फुकट मिळतेय म्हणून काही जन ते पदार्थ घेत आणि अर्ध खाऊन फेकून देत होते. रस्त्याभर पाण्याच्या पिशव्या, कागदी डिशेश यांचा कचरा साचला होता. लहान मुले पाण्याच्या पिशव्या एकमेकांच्या अंगावर रिकाम्या करत होते. अन्नाची आणि पाण्याची नासाडी चालू होती पण कुणाला त्याची पर्वा नव्हती आणि पर्वा करूनही काही उपयोग नव्हता.
   
     अखेर शिर्डी आले. गर्दीचा महापूर दिसत होता. 'गावकरी' दरवाजातून पालखी भक्तांना प्रवेश दिला जात होता. गर्दीत थोडी फार धक्का बुक्की चालू होती. माझ्या शेजारी एक आई आपल्या लहानग्या मुलाला (६ महिन्यापेक्षा लहान असावे ) घेऊन धक्क्यातून आपल्या मुलाला सांभाळीत होती. ती रडत होती. बहुदा तिचे कुटुंब गर्दीत हरवले गेले असावे. परत एक धक्का बुक्की झाली आणि ती बाई नजरेआड झाली. तिचे काय झाले असावे हे त्या साईलाच माहित.
   
     साईबाबाची मूर्ती पाहत सगळे नतमस्तक होत होते. काही जन बाबांच्या मूर्तीचे फोटो मोबाईल फोनवरून काढत होते. पोलीस फोटो काढणाऱ्याचा मोबाईल फोन हिसकावून घेत होती. पण पुढे पाहतो तर काय तर चक्क वी.आय.पी. गेट मधून आलेल्या त्या वी.आय.पी मुल्ला मौलवींचे साईबाबाच्या समाधी बरोबर फोटो काढण्यासाठी खास फोटोग्राफर होता. आता मात्र टाळकेच फिरले. श्रद्धा आणि सबुरी च्या दरबारात माझ्यामध्ये श्रद्धा शिल्लक होती पण सबुरी गायब झाली. वी.आय.पी साठी खास फोटोग्राफर आणि सर्व सामन्यांसाठी मोबाईल फोनवरुन फोटो काढण्यास बंदी ! वारे रे संस्थान !! साईच्या फोटोसाठी भक्तांना कसली आली परवानगी ??? शेवटी आम्ही साईबाबांचा फोटो घेण्यात यशस्वी झालोच. मग दर्शन घेऊन बाहेर पडलो ते खूप सारे प्रश्न घेऊनच.
     
                              

     नियम सगळ्यांना सारखे का नाही? वी.आय.पी. गेट मधून येणारे आरामात दर्शन आणि photography करतात आणि तासनतास रांगेत उभे राहणारे भाविक साईबाबांच्या निष्ठेपोटी स्वताचे हाल सहन करून घेतात. पण खरय... निष्ठेने, रांगेत तासनतास उभे राहून दर्शन घेण्यातला आनंद खूप वेगळाच असतो. शिर्डी वोही आते हे जिन्हे साई बाबा बुलाते हे.........!!!